MR/Prabhupada 0321 - मूळ विद्युतगृहाशी सदैव जोडलेले



Lecture on SB 1.15.28 -- Los Angeles, December 6, 1973

चैतन्य महाप्रभू सांगतात की आपल्याला ज्याप्रकारे शिकविण्यात आले आहे, आपण त्यानुसारच आचरण करायला हवे, आपनि आचरि, मगच तुम्ही इतरांना शिकवू शकता. जर तुम्ही स्वतः आचरण करणार नाही, तर तुमच्या शब्दांना काही किंमत असणार नाही. (खंड)... एवं परम्पराप्राप्तम् (भ. गी. ४.२.). जर मूळ विद्युतगृहाशी तुमच्या घराची जोडणी झाली असेल, तरच तुमच्या घराला विद्युतपुरवठा होईल. अन्यथा केवळ तारा असतील. त्या तारांची किंमत काय आहे? नुसत्या तारांनी काहीच होणार नाही. त्यांची जोडणीसुद्धा झाली पाहिजे. आणि जर तुमची जोडणी खंडित झाली, तरी काही किंमत नाही. त्यामुळेच कृष्णभावनामृत आंदोलन म्हणजे तुमची मूळ विद्युतगृहाशी सदैव जोडणी असली पाहिजे. आणि त्यानंतर, जेथेही तुम्ही जाणार, तेथे प्रकाशच असेल. तेथे प्रकाशच असेल. जर तुमची जोडणी खंडित झाली, तर प्रकाश असणार नाही. बल्ब आहे; तारा आहेत; स्विच आहे. सगळेकाही तेथे आहे. याच पद्धतीने अर्जुनही विचार करत होता, "मी तोच अर्जुन आहे. मी तोच अर्जुन आहे ज्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर युद्ध केले होते. मी किती महान योद्धा म्हणून ओळखला जात असे, आणि माझा धनुष्यही तोच आहे, माझे बाणही तेच आहेत. पण आता ते सर्वकाही निरुपयोगी आहे. मी स्वतःची रक्षा करू शकत नाही, कारण आता मी श्रीकृष्णांच्या संपर्कात नाही. आता कृष्ण येथे नाहीत." त्यामुळेच तो श्रीकृष्णांचे शब्द आठवू लागला, जे त्याला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर सांगण्यात आले होते.

कृष्ण व त्यांचे शब्द परस्परांहून भिन्न नाहीत. ते पूर्ण आहेत. कृष्णांनी जे पाच हजार वर्षांपूर्वी सांगितले, जर तुम्ही तेच शब्द आज आठवणार, तर तत्क्षणीच तुम्ही कृष्णांच्या संपर्कात येणार. हीच प्रक्रिया आहे. अर्जुनालाच पहा. तो म्हणतो, एवं चिन्तयतो जिष्णोः कृष्णपादसरोरुहम् । जेव्हा तो कृष्ण व युद्धभूमीवर त्यांनी दिलेल्या शिकवणींचे स्मरण करू लागला, तत्क्षणीच तो शांत झाला. तत्क्षणीच शांत झाला. हीच प्रक्रिया आहे. आपला श्रीकृष्णांशी शाश्वत घनिष्ठ संबंध आहे. तो काही कृत्रिम नाही. त्यामुळे जर तुम्ही स्वतःला सदैव कृष्णांशी जोडलेले ठेवणार, तर कोणतीही अशांतता निर्माण होणार नाही. शांतीपूर्ण. यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः । जर तुम्हाला ती स्थिती प्राप्त झाली, तर तो सर्वोच्च लाभ असेल. यं लब्ध्वा च, मग तुम्हाला अन्य कोणत्याही लाभाची इच्छा नसेल. तुम्हाला कळेल की तुम्हाला सर्वोच्च लाभ प्राप्त झाला आहे. यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः । यस्मिन्स्थितः... आणि जर तुम्ही स्वतःला त्या स्थितीत स्थिर ठेवणार, तर, गुरुणापि दुःखेन न ।। (भ. ग. ६.२०-२३), अत्यंत भीषण आपदांमध्येही तुम्ही अशांत होणार नाहीत. ही आहे शांती. ही आहे शांती. असे नाही की लहानशा चिमटीने तुम्ही अशांत झालात. जर तुम्ही कृष्णभावनेत स्थित असाल, तर तुम्ही अत्यंत भीषण विपदांमध्येही अशांत व अस्थिर होणार नाहीत. हीच कृष्णभावनेची उत्कृष्टता आहे. खूप खूप धन्यवाद.